माझीया मना



किती तरी दिवस उलटून गेले तुला पाहिलं नाही, मनातलं काही बोललो नाही. तुझ्याशिवाय जगणं म्हणजे केवळ वैरान वादळ. तू दुखी होशीलही कदाचित माझ्याशिवाय पण विसरू शकशील का मला ?
      हातात गुंफलेले हात.... तुझ्या भाळी टेकलेले माझे ओठ ..... तुझ्या लांब रेशमी केसांतून फिरणारी माझी बोटं .... क्वचितच आवेशानं घेतलेलं चुंबन .... अधीरतेनं दिलेलं आलिंगन .... विसरू शकशील का ?
     भेटण्यासाठी पाहिलेली वाट... अश्रुंचे खळखळनारे  पाट... हृदयात  ओथंबलेलं प्रेम .... ओठांवरून अलगद टिपलेला पाण्याचा थेंब.... तो रुसवा , तो फुगवा ... सहवास जो हवा हवा .... सोल्यांतील व्याकुळता ..... श्वासांची अधीरता .... विसरू शकशील का?
     तू विसरू शकशील का? एकमेकांसाठी भांडलो सगळ्यांसोबत ... घेतली होती शपथ राहू नेहमी सोबत .... आवडायचो मी तुला आणि हवी होतीस तू मला ... सोबतच जगणार होतो, मरणही एकत्रच भोगणार होतो. एकत्रच गायचं होतं जीवनगाणं ! विसरू शकशील का तू?
      नाही प्रिये , तू कशी विसरू शकशील मला .... कारण मला विसरण्यासाठी तुला अगोदर आठवावं लागेल मला ... आणि मला आठवायची गरजच काय ? मी तर नेहमी तुझ्याच सोबत राहणार आहे. शरीरापर्यंत कधीच पोहोचायचं नव्हतं मला .... पोहोचायचं होतं तुझ्या मनापर्यंत ! अगदी खोल गाभाऱ्यात.... तिथं तर केव्हाच पोहोचलोय मी .... दिवस सरतील तसा होईलही अस्पष्ट आणि धूसर मी... तरीही राहीन सुप्तावस्थेत पुन्हा एकदा अंकुरण्यासाठी...  लागतील जन्म काही.... उलटतील जन्म काही ..... पण मी तर तुझाच आहे गं ! प्रत्येक जन्मासाठी .....  !