Sunday, June 10, 2012

तुझ्या माझ्या सवे कधी

तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊसही
तुझ्या माझ्या मध्ये तेव्हा बरसायचा पाऊसही
भिजलेल्या मना माझ्या आठवतं ना तुला
तुझ्या माझ्या मध्ये तेव्हा असायचा पाऊसही....

Saturday, April 14, 2012

त्या रात्री


चांदण्या रातीत तुला शोधताना, 
निखळता तारा आसवांत आला 
पेटलेला हा अंगार विझताना ,
कधीतरी येना चुकवून पावसाला 

Sunday, March 11, 2012

एक हरवलेली वाट


तुझ्या सौंदर्याचं वर्णन मी शब्दांत कसं मांडू
काही लिहायला घेतलं की शब्दच विरघळून जातात

विरघळलेल्या शब्दांचा मग मी बर्फ करत बसतो
शब्दांना गोठवण्याच्या नादात स्वताच हरवून जातो

हरवलेल्या वाटेवरती मग मी तुला पुन्हा भेटतो.....

तुझा हात हातात घेत... तुझ्या डोळ्यांमध्ये पाहत....
“ किती ऊशीर केलास... आता नाही ना जाणार..... ”

तू मात्र... फक्त हसतच राहतेस
“ अगं किती हसतेस, लोक वेडं म्हणतील आपल्याला ....”
तू हसत असतेस आणि मी समजावत असतो तुला

आणि अचानक.... अगदी क्षणातच.....
तू नसल्याची जाणीव....
मन सुन्न.... दाही दिशा सुन्या होतात मला....
आणि डोळ्यातून ओघळणारा एक अश्रू
टपकन समोरच्या ग्लासात पडतो....

वितळलेल्या त्या ग्लासातल्या बर्फाकडे पाहत
मी एकटाच हसतो.....

ही नशा तुझ्या सौंदर्याची की मदिरेची
छापा काटा करीन म्हणतो,
तर रुपया पण खोटाच......

Saturday, March 03, 2012

गुलमोहोर प्रकरण १ ले

मिसकॉल


उन्हाळ्याचे दिवस होते... बाहेर रणरणतं उन..... दुपारी अडीच तीनची वेळ. आम्ही सारे मित्र गच्चीत बसलेलो. प्रसाद, वरुण, मी आणि आमचा जाली मित्र बंड्या. त्याला जाली म्हणण्यासारखं असं काहीच नव्हतं पण का कुणास ठाऊक तिथले सगळेच त्याला जालीच म्हणायचे म्हणून मग मी पण. बंड्याभाई म्हणजे आमचा सिनिअर. नावाला सिनिअर... वर्षानुवर्षे एकाच वर्गात काढलेला, कॉलेजचा पुराणपुरुष म्हणायचे त्याला. तर असा हा बंड्या भाई नुकताच आमच्या खोलीमध्ये आमचा रूम पार्टनर म्हणून आला होता. प्रसाद आणि वरुण दोघेही मुंबईचे... मी आणि प्रसाद आमची कॉलेजच्या पहिल्याच दिवशी जोरात भांडणे झालेली.... आणि भांडणानंतर झालेले आम्ही पक्के मित्र. त्याच दिवशी संध्याकाळी दोघानाही शोधून शोधून थकल्यानंतर एकचं खोली मिळावी हे आमचं भाग्यचं होतं जणु. अनोळख्या ठिकाणी शत्रू सहज मिळतील पण भाड्याने खोली मिळणं खुपच कठीण. तेव्हा प्रसाद आणि मी एका खोलीत राहायला लागलो. मग पुढे दोनच दिवसात प्रसादचा चुलत भाऊ वरुण सुद्धा आमच्यात सामील झाला होता. वरुण इंजिनिअरिंग करत होता. आणि प्रसाद सायन्स ला होता. मी व वरुण एकाच वर्गात. त्यामुळे वरुणची आणि माझी चांगलीच गट्टी जमली होती. सगळं काही मस्त चाललं होतं आणि अशातचं बंड्याभाई आमच्यात सामील झाला होता.    

गुलमोहोर


                गुलाबी थंडीशिवाय माहोल कसा तयार होणार ? आज पहाटे छानच थंडी होती. गेले दोन दिवस ती चांगलीच जाणवते आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे सगळं वातावरणच बदलत चाललंय असं तज्ञमंडळी सांगत असतात, आपल्याला काय त्याचं...? आम खाने का पेड नही गीननेका म्हणजे झाडे नाही मोजायची. झाडे मोजून ना वाढणार आहेत ना कमी होणार आहेत.
                फुललेला गुलमोहोर किती छान दिसतो ना. एखादं सुकलेलं झाड आणि त्यावर फुललेली ती मस्त लाल लाल फुलं. आज तर तो खुपच मनमोहक दिसतो आहे असं वाटलं. हा गुलमोहोर खूप वर्षांपासून आहे असं आजी सांगायची. दारातला हा गुलमोहोर पाहताना भानच राहत नाही. भानावर आलो तेव्हा आईची हाक ऐकू आली, "अरे किती वेळ असा पडून राहणार आहेस , आता लगेचच अंघोळ करून घे बघू , आज कॉलेजला नाही जायचं का तुला ...? " कॉलेजला हा शब्द ऐकला आणि मग माझी धावपळ सुरु झाली. एकतर सात वाजून गेले होते. तयारी करून घराबाहेर पडेपर्यंत आठ तर वाजतातच आणि सव्वाआठ्ला असतो तो तिचा मिस कॉल. मिसकॉल आला की मग आपण कॉल  करायचा....
                "अरे किती उशीर करतोयस, बघ मग तुला ट्रेन नाही मिळणार..." आई स्वयंपाकघरातून बोलत होती.  मी घडयाळात पाहिलं. साडेसात वाजले होते. अंघोळ चहा नाश्ता आटोपून कॉलेजसाठी निघालो. अजून तरी तिचा मिसकॉल आलेला नव्हता. लक्ष सारखं मोबाईल कडेच जात होतं...
                 तसं तिचं माझं नातं अनामिकच. प्रेम होतं की मैत्री होती कधीच नाही सांगता आलं, आणि आजतागायत नाही समजलंय मला. तशी मला आवडायची ती पण.... पण तिचं मन ओळखणं खुपच कठीण होतं, अशक्यच होतं जणु....
                 मोबाईलचा गजर वाजायला लागला. ८ वाजून १० मिनिटे झाली होती. आता कोणत्याही क्षणी तिचा  मिसकॉल  येणार होता. मिनिटा मिनिटाला हृदयाचे ठोके वाढत होते. मनाची चल बिचल व्हायला लागली होती. एरवी मी तिच्याशी बोलायचो पण असं मध्ये कधीतरीच, नेहमीच नाही. नेहमी बोललो तर मग कॉलेजमधली मुलं तिच्या नावानं चिडवतील असं वाटायचं. मला चिडवलं तर काही नाही हो पण त्या मुलीला किती वाईट वाटेल ना असा विचार करूनच मग बोलणं टाळायचो.
                 साडेआठ वाजले होते. आज मिसकॉल का येत नाहीये... मन आता कासावीस व्हायला लागलं होतं... काय प्रोब्लेम झाला असेल.... की आज कोलेजलाच येणार नसेल.... नाही असं कसं होईल...? यायचं नसतं तर तिचा मेसेज नसता का आला...? तिच्या बिल्डिंगमधला पक्या... त्याच्यासोबत तर नसेल ना गेली...? सांगता येत नाही, सईला बाईकवर बसायला खूप आवडतं. मला बऱ्याच वेळा म्हणायची, "आता तू पण एक छानपैकी बाईक घेऊन टाक, म्हणजे मला तुझ्या पाठीमागे बसून आरामात जाता यईल " आणि मग गोड हसायची. तिचं ते गोड हास्य पाहण्यासाठी तर मी काहीही करायला तयार आहे.
                 आज तर अजिबात मनच लागत नाहीये. दिवसाची सुरुवातच खूप निगेटीव झाल्यासारखी वाटतेय... रेल्वे स्टेशनवर आलो तर समोरच ती भेटली. दर वेळी मलाच विषयाला वाचा फोडावी लागते. कधी तरी समोरून प्रश्न येऊ देत की, पण नाही. नुसते स्टेशनच्या पहिल्या टोकाकडे जाण्याच्या दिशेने चालत होतो. हाय आणि गुड मॉर्निंग नंतर एकाही शब्दाची देवाण घेवाण झाली नाही.
                  आज सई खुपच सुंदर दिसत होती. मला तर ती रोजच सुंदर दिसते पण आज काहीतरी वेगळी वाटत होती. एरवी केस बांधायची, पण आज.... आज केस मोकळे सोडले होते. लाल कलरच्या नक्षीदार काम केलेल्या अनारकली ड्रेसमध्ये खुपच मनमोहक वाटत होती ती. मनात म्हटलं, " आज काहीतरी खास असेल " तेवढयात ती म्हणाली, "सागर... " तिच्या हाकेने भानावर आलो. "सागर.... आज आपण बाहेर जाऊया का ? माझं मन नाही लागत आहे कॉलेजला जायला "  तिच्या शब्दांनी क्षणभर माझी पावलं थांबल्यासारखी वाटली. सईनं आजपर्यंत असं काही कधीच म्हटलं नव्हतं. उलट मीच कितीतरी वेळा  तिला  म्हणायचो, " काय यार सई, आपण पण जात जाऊ ना बाहेर कधीतरी फिरायला " आणि माझ्या या प्रश्नावर तिचं ठरलेलं उत्तर असायचं , "हो जाऊ रे आपण पण... पण कॉलेज संपल्यावर" .
                   " ए सागर .... अरे काय झालं? लक्ष कुठे आहे तुझं.... ठीक आहे चल कॉलेजलाच जाऊ आपण" माझ्या चेहऱ्यावरचं असमाधान कदाचित जाणवलं असेल तिला . पण असं काही नव्हतंच. तिला वाटलं असेल कदाचित तसं... खरं तर या आधी एकदा माझ्या म्हणण्यावर सई माझ्याबरोबर बाहेर आली होती. तो पावसाळा आजही माझं मन ओलं करून जातो आणि डोळेही.....

क्रमशः 

Monday, February 13, 2012

रस्ता ओळखीचा ....

ओंजळीत माझ्या होते 
थोडे पाणी पावसाचे 
क्षण काही जपलेले 
स्वप्नातल्या नवसाचे 

पाखरांची फांदी माझी
मनावर रेळलेली

वसंतात भावफुले
हातावर झेललेली 

अशीच एक आठवण
मनात साठवून आहे
रस्ता एक ओळखीचा
पापणीत दाटवून आहे 

Tuesday, February 07, 2012

किनारा

दिल की बातों से में अनजान था 
प्यार तो उसने ही  सिखाया
थांबकर हाथोंमे हाथ मेरा 
मुझे उम्मीद की ओर बढाया 


जिंदगी के एक मोड पर 
फिर वो मुझे अकेला छोड गई
प्यार के इस नाजूक रिश्ते को 
वो बडी आसानी से तोड गई 


प्यार के गहरे सागर मे
उसकी मौजो को में सह गया 
उसने तो किनारा पकड लिया 
पर में उसमे बह गया 


आज में अकेला हू 
और मेरी कुछ फारियादे  है 
दिल के एक  कोनेमे 
कुछ छुपी हुई यादें है 

तुझ्याचसाठी ....

तुझ्यासाठी तुझ्यापाठी 
                 कुणीतरी झुरतं आहे 
गच्च निळ्या मेघांमध्ये 
                 एक आकाश झरतं आहे....
मनाचा या डोह होतो 
                 आठवणीनी ओलाचिंब 
डोहातल्या पाण्यातही
                 पुन्हा तुझंच प्रतिबिंब.... 

तुझ्यासाठी तुझ्यापाठी  कुणीतरी झुरतं आहे 

Saturday, January 14, 2012

कातरवेळी तुझी आठवण....


कातरवेळी तुझी आठवण मनात दाटून येते
डोळ्यांमधले पाणी तेव्हा असेच आटून येते
 तहान सागराची मग डोळ्यांत साठते माझ्या
एक वाट वादळाची या मनी दाटते माझ्या
डोळ्यांना या समजावताना का ही वेदना गोठून येते 
डोळ्यांमधले पाणी तेव्हा असेच आटून येते
डोळ्यांत साठलेले ते पाणी हळूच येता
हळव्या पाण्यासंगे मन मग कासावीस गं होते
शब्दांमध्ये गोठलेले मन माझे मग विरघळून येते
डोळ्यांमधले पाणी तेव्हा असेच आटून येते
कातरवेळी तुझी आठवण मनात दाटून येते
डोळ्यांमधले पाणी तेव्हा असेच आटून येते

Monday, January 09, 2012

कादंबरी...

काळजाच्या प्रत्येक ठोक्यात फक्त तुझाच भास आहे
दंश करणाऱ्या सापालाच जणू वनवास आहे
बगळ्याविना फक्त माशालाच उपवास आहे
रीतच अशी जगाची मग का उलटा तपास आहे

दुःख आठवणीतले

एक दुःख तुझ्या आठवणीचं....
तू एकटी असताना तुझ्यासवे जगण्याचं
एक दुःख तुझ्या आठवणींचं ....
कधी रडता रडता तुझ्यासवे हसण्याचं