मिसकॉल
उन्हाळ्याचे दिवस होते... बाहेर रणरणतं उन..... दुपारी अडीच तीनची वेळ. आम्ही सारे मित्र गच्चीत बसलेलो. प्रसाद, वरुण, मी आणि आमचा जाली मित्र बंड्या. त्याला जाली म्हणण्यासारखं असं काहीच नव्हतं पण का कुणास ठाऊक तिथले सगळेच त्याला जालीच म्हणायचे म्हणून मग मी पण. बंड्याभाई म्हणजे आमचा सिनिअर. नावाला सिनिअर... वर्षानुवर्षे एकाच वर्गात काढलेला, कॉलेजचा पुराणपुरुष म्हणायचे त्याला. तर असा हा बंड्या भाई नुकताच आमच्या खोलीमध्ये आमचा रूम पार्टनर म्हणून आला होता. प्रसाद आणि वरुण दोघेही मुंबईचे... मी आणि प्रसाद आमची कॉलेजच्या पहिल्याच दिवशी जोरात भांडणे झालेली.... आणि भांडणानंतर झालेले आम्ही पक्के मित्र. त्याच दिवशी संध्याकाळी दोघानाही शोधून शोधून थकल्यानंतर एकचं खोली मिळावी हे आमचं भाग्यचं होतं जणु. अनोळख्या ठिकाणी शत्रू सहज मिळतील पण भाड्याने खोली मिळणं खुपच कठीण. तेव्हा प्रसाद आणि मी एका खोलीत राहायला लागलो. मग पुढे दोनच दिवसात प्रसादचा चुलत भाऊ वरुण सुद्धा आमच्यात सामील झाला होता. वरुण इंजिनिअरिंग करत होता. आणि प्रसाद सायन्स ला होता. मी व वरुण एकाच वर्गात. त्यामुळे वरुणची आणि माझी चांगलीच गट्टी जमली होती. सगळं काही मस्त चाललं होतं आणि अशातचं बंड्याभाई आमच्यात सामील झाला होता.
No comments:
Post a Comment